*कृषी विषयक कायद्यांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती त्वरीत दूर करा – माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे*
*महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे तहसील कार्यालया समोर निषेध आंदोलन*
कामठी : नवीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होणार असून आपल्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची विक्री व बाजारपेठेत त्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदीजींनी एमएसपी कुठल्याही परिस्थीतीत बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतक-यांना ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार आहे, मात्र शेतक-यांबाबत महाविकास आघाडी सरकारने पुतना मावशीचे प्रेम दाखवत या कृषी विषयक कायद्याला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती त्वरीत उठवावी व राज्यात केंद्राच्या या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी हे निषेध आंदोलन आम्ही करीत असल्याचे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कामठी तहसील कार्यालय प्रांगणात येथे भाजपा कामठी शहर व तालुकातर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जि प विरोधी पक्ष नेते अनिल निधान,भाजपा पदाधिकारी अजय अग्रवाल,संजय कनोजिया,किशोर बेले,नरेश मोटघरे,जि प सदस्य मोहन माकडे,प स सभापती उमेश रडके,नगरसेवक लालसिंग यादव,प्रतिक पडोळे,सुषमा सिलाम,संध्या रायबोले तसेच पंकज वर्मा,राजेश देशमुख, मंगेश यादव,किरण राऊत,लिलाधर काळे,रमेश चिकटे,आशिष वंजारी,राजा यादव,मनिष कारेमोरे,राजेश पिपरेवार,प्रितम लोहसारवा,कपिल गायधने, प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किसानों के सन्मान में मोदी सरकार मैदान में, स्थगिती रद्द करा शेतक-यांना न्याय द्या, महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम, कृषी विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करा, महाविकास आघाडी नव्हे तर महाबिघाडी अशा घोषणांचे फलक फडकावत राज्य सरकारचा निषेध केला.तसेच राज्यसरकारच्या शेतकरी विरोधी आदेशाची होळी करण्यात आली
आंदोलनानंतर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार सुनील तरुडकर याना सोपविले सादर केले. आंदोलकांच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन तहसीलदारांनीनी शिष्टमंडळाला दिले.