गुंडाची गळा कापून हत्या
पैशाच्या मागणीतून वाद : चनकापूर शिवारातील घटना , चौघांना केली अटक
खापरखेडा : पैशाच्या वाटाघाटीतून झालेल्या वादात खापरखेडा परिसरात राहणाऱ्या एका सराईत गुंडाची गळा चिरून हत्या करण्यात आली .अश्विन ढोणे ( २४ , रा . वॉर्ड क्रमांक ४ , खापरखेडा ) असे मृताचे नाव आहे . ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शिवराम नगर , चनकापूर येथे घडली . हत्येप्रकरणी रात्री ११ वाजताच्या सुमारास कोलारनदी पात्रात चौघांना अटक केली . शुभम राजेंद्र पाटील ( २२ ) , तुषार नारनवरे ( १८ ) , शानु केशव थापा ( २२ ) आणि एका विधीसंघर्ष बालकाचा यात समावेश आहे .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , मृत अश्विन ढोणे आणि शुभम पाटील हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत . अश्विनवर खून , खुनाचा प्रयत्न , मारहाण , अवैध कट्टा बाळगणे व वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर शुभम पाटीलवरही चोरीचे गुन्हे दाखलआहेत . शुभम याने काहीतरी प्रकरण करून ४ ते ५ लाख रुपये आणले असल्याची माहिती अश्विनला मिळाली होती . तेव्हापासून अश्विन हा शुभम आणि त्याच्या साथीदारांना त्यात वाटा मागत ब्लॅकमेल करीत होता . तीन दिवसापूर्वी अश्विनने शुभमच्या साथीदारास पैशाची मागणी करून चाकू दाखवीत शुभम व त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती . अश्विन आपला गेम करेल , अशी भीती दोघांना होती . त्यामुळे त्यांनी अश्विनचा काटा काढण्याचे ठरविले . त्यांनी अश्विनला वाटाघाटी करण्यासाठी शिवराम नगर येथील पडित शेतात बोलावले . त्यानंतर नियोजितरीत्या अश्विनला पकडून त्याचा गळा चिरला व शरीरावरही चाकूने धाव मारण्यात आले . अश्विन मृत झाल्याची खात्री पटल्यावर आरोपी तेथून पसार झाले . पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू , एक दुचाकी वाहन व दारूच्या बाटल्या जप्त केल्या . आरोपीच्या शोधासाठी खापरखेडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक तैनात होते . पथकाने रात्री या चौघांना कोलारनदी पात्रात अटक करून खापरखेडा पोलिसांच्या स्वाधीन केले .