राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला , औषधांचा तुटवडा , पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे- आरोग्यमंत्री टोपे
मुंबई , दि .२० मे : कोरोनापेक्षा जीवघेणा आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे . त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे . 31 मे नंतर आपल्याला या इंजेक्शन्सचा मोठा साठा मिळणार आहे . त्यामुळे पुढील 10 दिवस हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत , असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले . ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते . यावेळी त्यांनी म्युकरमायकोसिसच्या वाढत्या धोक्याविषयी गंभीर इशारा दिला . आजघडीला राज्यात म्युकरमायकोसिसचे 850 रुग्ण आहेत . त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज आहे . सरकार त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे . मात्र , ही इंजेक्शन्स 31 मे नंतरच उपलब्ध होऊ शकतील . परिणामी पुढील 10 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत , असे राजेश टोपे यांनी सांगितले .
‘ म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना मोठा दिलासा , उपचाराचा सर्व खर्च म . फुले जनआरोग्य योजनेतून होणार
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे . इतकंच नाही तर या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार असल्याचंही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले . महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत केली जात होती . मात्र , म्युकरमायकोसिसमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे . त्यामुळे या योजनेत काहीसा बदल करुन म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार असल्याचं टोपे यांनी जाहीर केले . त्यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे . ‘ सर्व रेशनकार्ड धारकांना लाभ मिळेल ‘ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत घोषणा करतानाच टोपे यांनी अजून एक महत्वाची माहिती दिली आहे . म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे , केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल , असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय .